
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री एका भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत तिघांचा जागीच, तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील वीर रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला. दोघा जखमींवर सुरुवातीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
महाडमधील काही तरुण स्कॉर्पिओ गाडीने माणगावच्या दिशेने जात होते. त्यांच्या वाहनातील डिझेल संपल्याने ते महामार्गालगत उभे होते. त्याचदरम्यान मागून येणाऱ्या एका टोइंग व्हॅनने (एमएच-१४-सीएम-३०९) महामार्गालगत उभ्या असलेल्या सहा जणांना जोरदार धडक दिली. ही घटना महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशनजवळ घडली. या दुर्घटनेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सूर्यकांत सखाराम मोरे (नवेनगर), साहिल नथुराम शेलार (२५) आणि प्रसाद रघुनाथ नातेकर (२५, कुंभारआळी) अशी त्यांची नावे आहेत, तर समीप सुधीर मिंडे (३५, दासगाव) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सध्या सूरज अशोक नलावडे (३४) आणि शुभम राजेंद्र मातळ (२६) या दोघांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.