भोकरलगत अपघातात ५ ठार, ४ जखमी

वाहनातील काही जणांनी आरडाओरड केल्याने जवळच्या शेतात असलेले शेतकरी मदतीसाठी धावून आले‌.
File Photo
File Photo

नांदेड : भोकरहून उमरी मार्गे गुरुवारी कारने मध्यरात्री तेलंगणाकडे जात असताना मोघाळी-हळदा गावालगत वाहनाचे समोरील टायर फुटून पुलावरून खाली पडल्याने गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर असून, चार जखमी झाले आहेत. मयतात एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश असल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोकरला नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम आटोपून तेलंगणाकडे वाहनाने जात असताना वाहनाचे समोरचे चाक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व पुलावरून वाहन खाली कोसळले. वाहनातील काही जणांनी आरडाओरड केल्याने जवळच्या शेतात असलेले शेतकरी मदतीसाठी धावून आले‌.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, दिलीप जाधव, संभाजी देवकांबळे, जमादार रवी मुधोळे, परमेश्वर कळणे, लहू राठोड, मंगेश क्षीरसागर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल, सुलेमान शेख, शाहरूख खान तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि वाहनात अडकलेल्या बाहेर काढले असता यातील सविता श्याम भालेराव (वय २५), प्रीती परमेश्वर भालेराव ( वय ८, दोघी रा. रेणापूर, ता. भोकर) व सुशील मारोती गायकवाड (वय ९, रा. रामखडक, ता. उमरी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव (वय ३०), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (वय २८), श्याम तुकाराम भालेराव (वय ३५, तिघेही रा. रेणापूर, ता. भोकर) यांना उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in