आषाढी एकादशीसाठी एसटीच्या ५ हजार बसेस धावणार

एसटी महामंडळाचा नियोजनाचा मुख्यमंत्र्यानी घेतला आढावा
आषाढी एकादशीसाठी एसटीच्या ५ हजार बसेस धावणार

२९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, जगभरातून येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सोमवार १५ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळासोबत एक आढावा बैठक घेतली. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. २५ जुन ते ५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळावर असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिरिक्त सुविधांचा आढावा घेताना पंढरपूर यात्रेसाठी वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बसेस सुविधा पुढीलप्रमाणे :

ठिकाण बसेस

औरंगाबाद १२००

मुंबई ५००

नागपूर १००

पुणे १२००

नाशिक १०००

अमरावती ७००

logo
marathi.freepressjournal.in