शेतकऱ्यांना ९६४ कोटींची कर्जमाफी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यातील सुमारे ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे
शेतकऱ्यांना ९६४ कोटींची कर्जमाफी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या राज्यातील ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच कर्जमाफीची ही रक्कम भूविकास बँकेकडून सरकारला येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे. तसेच राज्यातील सर्व भूविकास बँकांचे सेवानिवृत्त तसेच कार्यरत आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण देणी अदा करण्यात येणार असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त भूविकास बँकेच्या २४ जिल्ह्यांतील ४० मालमत्ता सहकार विभागाच्या ताब्यात आल्याने विभागाची या जिल्ह्यांमध्ये भाड्याच्या जागेत असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वत:ची जागा मिळणार असून या कार्यालयांच्या भाड्यापोटी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याशिवाय भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची २७५.४० कोटी रुपयांची देणी देण्यासाठी ही रक्कम सहकार आयुक्त आणि निबंधक यांना शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

अशा रकमेपोटी भूविकास बँकेच्या ५१५.०९ कोटी मूल्यांकनाच्या एकूण ५५ मालमत्तांपैकी सुमारे ४० मालमत्ता सहकार विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांसाठी सहकार विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येतील. सात मालमत्ता संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे हस्तांतरीत करण्यात येतील. चार मालमत्तांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात मान्यता देण्यात आली. तसेच सांगली भूविकास बँकेच्या अवसायन आदेशास उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने या बँकेच्या ४ मालमत्ता संबंधित बँकेकडे ठेवण्यास मान्यता देण्यात आली.शिखर भूविकास बँकेची शासकीय कर्जरोखे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधील मुदतठेवींची संपूर्ण रक्कम व्याजासह शासनाकडे हस्तांतरीत करुन घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in