अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले, साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह १० ठराव मंजूर

पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‌‘भारतरत्न' देण्यात यावा यासह विविध १० ठराव ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आले.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले, साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह १० ठराव मंजूर

विजय पाठक/पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर

पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‌‘भारतरत्न' देण्यात यावा यासह विविध १० ठराव ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आले. २ तारखेपासून सुरू झालेल्या संमेलनाचे रविवारी सायंकाळी सूप वाजले. या समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. खान्देशला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. समाजात साहित्याचे स्थान हे कायम पूजनीय राहिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ९७व्या साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी यशस्वी समारोप झाला. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाषा-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालक मंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवताना डोळ्यांनाही ताण पडला. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. म्हणून उपस्थिती देऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी साहित्यिक व कादंबरीकार यांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आजसारखे पोषक वातावरण व संधी त्यांना कधी उपलब्ध होणार नाही, असे सूचक वक्तव्य करत त्यांना राजकारणावर लिहिण्याचे सांगितले.

खानदेशभूमीमधील विशेषतः जळगाव व अमळनेर या ठिकाणी वाल्मिकी ऋषी, महर्षी व्यास, संत सखाराम महाराज व अनेक संतांनी स्पर्श झालेली भूमी आहे. यातच वाल्मिकी ऋषी यांचे नाव अयोध्येचे विमानतळाला देऊन खानदेश व अयोध्या यांची एक नाद जोडली गेल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी समारोप भाषणात केला.

ग्रंथालयाला विशेष अनुदान देणार

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथालयाला विशेष अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले व तालुक्याच्या ठिकाणी साहित्यच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहनही दिले जाईल व जिल्हा महामंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्याचा प्रचार, प्रसार होईल, असेही ते म्हणाले.

अमळनेरला पुस्तकाच्या गावाचा दर्जा देणार? -केसरकर

मुले मराठीत शिकली तरच मराठी टिकेल. मंत्री अनिल पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार अमळनेरला पुस्तकाच्या गावाचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव मांडू, पूज्य साने गुरुजींना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव तयार करणार, लेखक, प्रकाशकांनी अनुदानासाठी मराठी भाषा भवनाकडे अर्ज करावे. अर्ज आले तरच त्यांना अनुदान देता येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भाषा व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, पालक मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, पुनर्वसन व मदत मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यासह आजी-माजी आमदारांनी या संमेलनासाठी निधी दिला.

logo
marathi.freepressjournal.in