भ्रष्ट नेत्यांना प्रवेश देऊन संघाला धक्का! उद्धव ठाकरे यांची भाजपवर बोचरी टीका

जपचं वाईट वाटतं, भ्रष्ट नेते पक्षात घेऊन पक्ष वाढवायचा, भाजप कुठे राहिला आहे, भाजपची आता भ्रष्ट काँग्रेस झाली. ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना पक्षात घेता अन् आम्हाला तुरुंगात टाकता.
भ्रष्ट नेत्यांना प्रवेश देऊन संघाला धक्का! उद्धव ठाकरे यांची भाजपवर बोचरी टीका

नगर : विदर्भात गारपीट झाली, शेतकरी देशोधडीला लागला, शेतकरी अश्रू ढाळत आहेत. अशोक चव्हाण शेतकऱ्यांच्या दारात गेले नाहीत, तर मोदींच्या दारात गेले. आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना झोप येत नव्हती, आता भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रवेश म्हणजे संघाच्या आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना धक्का असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले. ते श्रीरामपुरात शिवसंवाद मेळाव्यात बोलत होते.

यावेळी ठाकरे म्हणाले, ‘‘सगळे भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी भाजप असा तो पक्ष झाला आहे. ज्यांनी भ्रष्टाचारात डीलर म्हणून काम केले आहे, त्यांनाच भाजपचे लीडर केले जात आहे. सडलेली पाने झडतात, ती झडलीच पाहिजेत. जे घाबरट आहेत, शेळपट आहेत, ते भाकड जनता पक्षात जात आहेत. वरून ते मोदींचे स्वप्न पूर्ण करायला गेल्याचे सांगतात. मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भाजपमध्ये नाही का? स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर पक्षातून लोक आयात करावे लागतात. कोरोनामध्ये व्हायरस होता, त्याला बाजूला ठेवण्यासाठी आपण हात धुवायचो, आता देशात एकाधिकारशाहीचा व्हायरस आला आहे. त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि त्याच्यामागे हात धुवून मागे लागा.’’

खा. संजय राऊत म्हणाले, ‘‘राज्यात सत्याचे शिवधनुष्य घेऊन ठाकरे लढत आहेत. राज्यकर्ते पक्ष फोडायला, गुंडगिरीत अडकले, मोठा नेता फोडायचा, पक्षात घ्यायचा, आरोप विसरायचा, त्याचा जयजयकार करायचा, अजित पवार यांना काकाने सर्व दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांनी सर्व दिले, अशोक चव्हाण यांना काँग्रेसने सर्व दिले, मात्र ते पळून गेले. पक्ष अडचणीत असताना पक्षाला साथ द्यायची असते मात्र पळकुटे पळून जातात, भाजपचं वाईट वाटतं, भ्रष्ट नेते पक्षात घेऊन पक्ष वाढवायचा, भाजप कुठे राहिला आहे, भाजपची आता भ्रष्ट काँग्रेस झाली. ज्यांना तुरुंगात टाकायचे त्यांना पक्षात घेता अन् आम्हाला तुरुंगात टाकता. नगर जिल्ह्यात गुंडगिरी वाढली आहे. वकिलांचा खून झाला, दरोडे वाढले, या सर्वांना सरकार समर्थन देते याचे वाईट वाटते.’’

मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू

‘‘फडणवीसांची अवस्था मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, अशी झाली आहे. पाव उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल तर काय बोलावे, हेच कळत नाही. ज्यांच्यावर ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचा जयजयकार करतात, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in