
मुंबई : ५०० रुपयांवर लाडक्या बहिणींची बोळवण करणाऱ्या महायुती सरकारने १०० दिवसांत काय केले. गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची आहे. रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसलेय, असा हल्लाबोल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक दिवसीय निर्धार शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.
ईशान्य मुंबईनंतर नाशिकमध्ये शिबीर पार पडले. आपण मैदानातील माणसे आहोत. पण दिशा, आपली वाटचाल ठरविण्यासाठी जिल्ह्यात, विभागात असे शिबीर झाले पाहिजेत. या सरकारच्या काळात पहिल्या १०० दिवसांत काय झाले ते बघा, एक तरी नवीन योजना आणली का?, लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून कमी केल्यात, हे सरकार तुमचे आहे असे वाटते का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. बीड, परभणीचे प्रकरण झाले. बीडचा आका कोण आहे? हे सर्वांना माहिती आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू
निवडणूक नसताना कर्जमाफी देणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. महिलांवर अत्याचार होत असल्याच्या विरोधात सर्वात कडक शक्ती कायदा आणणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. मात्र आताच्या सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांवरच बरसतात. मध्यंतरी मुख्यमंत्री दावोसला गेले, गुंतवणूक आणली सांगितले. मग तिजोरीत खडखडाट का आहे? नाशिकमध्ये स्मार्ट सिटी योजना पूर्ण झाली का? सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर केली.