ॲड. सुधाकर हिवाळे यांची भीमा-कोरेगाव ते दिल्ली पायी यात्रा

सरकारची प्रतिमा गोरगरीब सामान्य नागरिकांच्या हिताची नसून बड्या भांडवलदारांनाच सहकार्य करण्याची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली
ॲड. सुधाकर हिवाळे यांची भीमा-कोरेगाव ते दिल्ली पायी यात्रा

रमेश औताडे/मुंबई : भारत सरकारच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विभागात चालणाऱ्या मनमानी कारभाराविरोधात आरटीआय कार्यकर्ते ॲड. सुधाकर हिवाळे हे भीमा-कोरेगाव ते दिल्ली असा पायी प्रवास करणार आहेत.

सरकारच्या मनमानी भूमिकेविरुद्ध गळ्यात मडके व कमरेला झाडू बांधून हिवाळे हे भीमा-कोरेगाव ते दिल्ली असा पायी प्रवास करणार आहेत. भीमा-कोरेगाव शौर्य दिन १ जानेवारी ते १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत या माझ्या सामाजिक न्याय यात्रा पायी प्रवासात जनतेची गर्दी नसली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझ्यासोबत असल्यामुळे ही यात्रा क्रांती घडवेल, असा विश्वास हिवाळे यांनी व्यक्त केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेली ही माहिती या पायी सामाजिक न्याय यात्रेत जनतेला दाखवत जनजागृती करणार आहे.

सरकारची प्रतिमा गोरगरीब सामान्य नागरिकांच्या हिताची नसून बड्या भांडवलदारांनाच सहकार्य करण्याची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारनेच माहिती अधिकारातून हिवाळे यांना ही माहिती दिली आहे. या माहितीचे १९ खंड ऑनलाईन पुस्तक रूपाने हिवाळे यांनी प्रसिद्ध केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही आजही मानवी मैला यांत्रिकीकरण योजना देशभर लागू नाही. कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलाहाबाद येथे वाल्मिकी मेहतर सफाई कर्मचारी महिलांचे पाय धुवत असताना जगभर मोठी प्रसिद्धी झाली; मात्र आजही दिल्ली, राजस्थान, हरयाणा, बिहार, महाराष्ट्र आदी ठिकाणी मैला सफाई मानवी पद्धतीने होते. ही सफाई होत असताना १९९३ ते ३१ मे २०२३ पर्यंत गुदमरून मेलेले १०८८ (नोंद नसलेले वेगळे) वाल्मिकी मेहतर कामगारांच्या कुटुंबाला १० लाख भरपाई मिळाली नाही, असे सांगताना हिवाळे यांना अश्रू अनावर झाले.

logo
marathi.freepressjournal.in