कृषिमंत्री कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, विवाह करत फिरता

नाशिक : काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करावयाचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता, असे धक्कादायक विधान कोकाटे यांनी केले आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, विवाह करत फिरता
कृषिमंत्री कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, विवाह करत फिरतासंग्रहित छायाचित्र
Published on

नाशिक : काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करावयाचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता, असे धक्कादायक विधान कोकाटे यांनी केले आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कोकाटे यांनी पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा प्रश्न विचारला असता त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. कोकाटे यांच्या या विधानावर शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे.

कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता, कर्जमाफी दिल्यावर एक रुपयाची तरी शेतात गुंतवणूक केली का, सरकार आता शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे. शेतीच्या पाईपलाइनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात. सरकार भांडवली गुंतवणूक देते. शेतकरी या पैशांचा त्याच कामासाठी उपयोग करतो का, शेतकरी म्हणतो कर्जमाफी पाहिजे, विम्याचे पैसे पाहिजे आणि करतात काय, तर साखरपुडा आणि लग्न करा. या पैशांचा शेतीला काही उपयोग केला का, असा प्रश्न कोकाटे यांनी विचारला.

कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - सपकाळ

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकाटे यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजप- युती सरकार सोडत नाही. कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न-साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का? असा प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते. त्यात कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही. सरकारची धोरणे जर शेती व शेतकऱ्याला अनुकूल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहील. पण भाजप युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, असेही ते म्हणाले.

मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे वर्तमानपत्रात वाचले, पण मंत्री हे मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. वाट्टेल ते बरळतात. फडणवीस सरकारमध्ये एक एक मंत्री नमुना आहे, असे आम्ही म्हटले होते. माणिकराव कोकाटे हा त्यातीलच एक नमुना आहे. अशा मंत्र्यांना आवर घालावी. शेतमालाला भाव नाही, हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे, शेतकरी संकटात असून दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याची कृषिमंत्री वा भाजप युती सरकारला लाज वाटत नाही, पण उलट शेतकऱ्यांनाच अजब प्रश्न विचारता, हा सत्तेचा माज शेतकरी नक्की उतरवेल हे लक्षात ठेवा, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.

कोकाटे कृषी क्षेत्रातले कामरा, राऊतांची टीका

शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा बनल्याची टीका केली. राऊत म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून कोकाटे राजकारणात आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारी विधाने करू नयेत. अशी विधाने का करतात, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला पाहिजे. नाहीतर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणे ऐकली, बहुतेक त्यांनी कॉमेडी शो सुरू केलाय. राज्याचे कृषिमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत. खिल्ली उडवतायत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

राज्याला बिनडोक कृषिमंत्री मिळाला - शेट्टींची टीका

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. मात्र हे सरकार संवेदनाहीन आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, राज्याला बिनडोक कृषिमंत्री मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली होती. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असताना कृषिमंत्री मात्र बेताल वक्तव्य करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in