
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे प्रेरणा आणि ऊर्जास्थान आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शनिवारी अहिल्यानगरमधील चौंडीत भव्य कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना घेतला. खरे म्हणजे राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. यासाठी मी जेव्हा मोदी यांना भेटलो आणि सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचे आहे. तेव्हा मोदी म्हणाले की, माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ. मोदींनी सांगितले की, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मस्थळावर मी सभा घेण्याचे ठरवले आहे. मात्र, पुढच्या वेळी जन्मस्थळावर नक्की येईल, असा विश्वास मोदींनी आपल्याला दिला, असे फडणवीस यांनी सांगितले. आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला थोडा उशीर झाला होता. मात्र, तरीही मला विश्वास आहे, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी लवकरच मुर्मू आणि मोदी येतील, असेही ते म्हणाले.
बहुभाषिक चित्रपट
फडणवीस पुढे म्हणाले की, कधी कधी इतिहास हा फार क्रूर असतो. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता चित्रपटाची निर्मिती करावी लागली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या नव्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला. याआधीही माहिती होता, पण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे आमच्या लक्षात आले की चित्रपट हे असे माध्यम आहे त्यामधून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्या सरकारच्या मंत्रिमंडळाने अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.