समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅब्म्युलन्स सुरु होणार! वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

समृद्धी महामार्गावरील अपघातात अनेकांचे प्राण गेलेत तर काहींना दुखापत होऊन आयुष्यभराचं अपंगत्व आलं. यामुळे या महामार्गाला मृत्यूचा सापळा देखील म्हटलं गेलं आहे
समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅब्म्युलन्स सुरु होणार! वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
Published on

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग हा सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. हा महामार्ग सुरु झाल्यानंतर यावर अनेक अपघात घडले. यात अनेकांचे प्राण गेलेत तर अनेकांना गंभीर दुखापत होऊन आयुष्यभराचं अपंगत्व आलं. यामुळे या महामार्गाला मृत्यूचा सापळा असं देखील म्हटलं गेलं. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघात लक्षात घेता ते कमी करण्यासाठी तसंच अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारने उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकार लवकरच समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांसोबत राज्य सरकारची चर्चा सुरु आहे. एखादी दुर्घटना घडल्यास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं शक्य होणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच हेलिकॉप्टर कंपन्यांशी करार करणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यापुर्वी समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत समृद्धी महामार्गालगत जवळपास १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. अपघातानंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहे. इगतपुरी ते खर्डी दरम्यान महामार्गाच्या बोगदा विभागाजवळ पहिले हेलिपॅड असणार आहे. ज्याचे बांधकाम देखील सुरु करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. यात २५ ते २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या अपघातात अपघातग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला होता. तसंच या महामार्गावर ब्रेकपॉईंट नसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान, समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्य सरकारने समृद्धीवर अनेक सुविधा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in