
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? तुम्हाला सांगतो, हे आश्वासन मी तरी दिलेले नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून हात झटकले आहेत.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. सत्तेत आल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कर्जमाफीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची चौफेर झोड उठवली होती. मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याविषयी वारंवार विचारणा करण्यात आली होती. मात्र, आता अर्थमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी हात वर केले आहेत.
लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवार म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेचे आम्ही नियोजन केले आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केले असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत आहोत. पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, पण रायगडला पालकमंत्री दिला नाही म्हणून काही अडले आहे का? सर्व कामे होत आहेत, कोण काय बोलले याबद्दल मला विचारू नका.”
शेतकऱ्यांची फसवणूक केली - राजू शेट्टी
राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्यातील अतिरेक्यांपेक्षाही क्रूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीबाबत फसवणूक केली आहे. फडणवीसांनी १०० दिवसांच्या सरकारच्या कार्याचे मूल्यमापन करताना शेतकरी आत्महत्या किती झाल्या, याचा लेखाजोखा तपासावा म्हणजे तुमच्या अपयशाचा आरसा तुम्हाला दिसेल.”