
मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेली सर्व शासकीय कार्यालये स्वमालकीच्या इमारतीतच असणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, यासाठी विशेष निधीची तरतूद करत इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राज्यात ज्या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत, त्याठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने कामांचे, वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाची असणाऱ्या ‘अहिल्या नगर-बीड -परळी’ रेल्वेच्या कामाला गती देण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.
...या कामांचा आढावा
पुणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, पुणे मेट्रो १ व २ मार्गिकेच्या कामाचा आढावा घेत, कोकणच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी किनारा महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.