
राज्यात पार पडेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी गावातील ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला मोठं यश प्राप्त झालं आहे. काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. असं असलं तरी भाजपने मात्र राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आपलं खात उघढलं आहे. भाजपनं पहिल्यांदाच काटेवाडीत 2 जागा जिंकल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायत निकालामध्ये भाजप गट प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसर्या क्रमांकावर अजित पवारांचा गट आहे. शरद पवारांविरोधात बंड पुकारल्यानंतर अजित पवारांसमोर या ग्रामपंचायतीच्या निवडणूका महत्त्वाच्या होत्या.
काटेवाडी हे अजित पवारांचं गाव असल्यामुळे तेथील निकाल महत्त्वाचे होते. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार भाजपा सोबत सत्तेमध्ये बसले आहेत. तरीही ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ते भाजपासमोर राहिले होते. अजित पवार गट पुरस्कृत जय भवानी माता पॅनलचा काटेवाडीतून विजय झाला आहे. पण काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली एक हाती सत्ता आता त्यांनी गमावली आहे.
काटेवाडीप्रमाणे बारामतीमध्येही अजित पवारांचे वर्चस्व आज बघायला मिळाल आहे. बारामतीत आत्तापर्यंत 22 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी 21 राष्ट्रवादीकडे आहेत तर एका ग्रामपंचायतीवर भाजपने ताबा मिळवला आहे. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथे भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे.