सारस्वतांची मांदियाळी! अमळनेरात आजपासून ९७ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिक दाखल

१९५२ नंतर ७२ वर्षांनी अमळनेरात हे संमेलन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह साहित्यप्रेमी अमळनेरात दाखल झाले आहेत.
सारस्वतांची मांदियाळी! अमळनेरात आजपासून ९७ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिक दाखल

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर येथे होत आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह साहित्यप्रेमी अमळनेरात दाखल झाले आहेत. १९५२ नंतर ७२ वर्षांनी अमळनेरात हे संमेलन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ होईल. याआधी वाडी संस्थानपासून सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होईल. सकाळी १० वाजता प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल. सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहतील.

दुपारी २ वाजता बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. बालमेळाव्याचे समन्वयक एकनाथ आव्हाड मनोगत व्यक्त करतील. भय्यासाहेब मगर सूत्रसंचालन करतील. दुपारी ३.३० वाजता राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल. अमरावतीचे डॉ. मनोज तायडे अध्यक्षस्थानी असतील. यात मुंबईचे ॲड. धनराज वंजारी, लातूरचे डॉ. ज्ञानदेव राऊत, वाळवा येथील दि. बा. पाटील, बिदर येथील इंदुमती सुतार, धरणगाव येथील प्रा. चत्रभूज पाटील सहभागी होतील. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर ज. जोशी करतील. सायंकाळी ५.३० वाजता कविसंमेलन होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

सभामंडप क्रमांक २ मध्ये दुपारी २ वाजता ‌‘कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश कोल्हे असतील. दुपारी ३.३० वाजता ‌‘सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. छत्रपती संभाजीनगरचे बाबा भांड अध्यक्षस्थानी असतील. यात पुणे येथील डॉ. केशव तुपे व अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने सहभागी होतील. दुपारी ४.३० वाजता ‌‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान या विषयावर परिसंवाद होईल.

सभामंडप क्रमांक ३ मध्ये दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कविकट्टा होईल. राजन लाखे आणि सहकारी या कविकट्ट्याचे संयोजक आहेत.

‘वासुदेव’ची जनजागृती

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाचा प्रचार आणि प्रसार हा ‌‘वासुदेवा’च्या रूपातून करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाची माहिती शहरातील घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहे. तब्बल ७२ वर्षांनंतर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन हा वासुदेव करीत आहे. कालबाह्य होत चाललेला ‌‘वासुदेव’ शहरवासीयांना दिसला. २५ जणांची ही टीम होती. संमिश्र पानावर

logo
marathi.freepressjournal.in