

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (दि.२४) दुपारी वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी सुमारे तीन- चार किलोमीटर लांब रांगेत अडकले होते, त्यामुळे महामार्ग प्रशासनाने तातडीची वाहतूक बदल व्यवस्था लागू केली आहे.
१५ मिनिटांचा वाहतूक ब्लॉक, अमृतांजन पूल ते दत्तवाडी दरम्यान सर्वाधिक कोंडी
सकाळपासूनच जड वाहतूक सुरू होती. अमृतांजन पुलापासून दत्तवाडीपर्यंत वाहनांची गती अत्यंत मंदावली. घाटातील तीव्र वळणे आणि काही वाहनांचे बिघाड यामुळे महत्त्वाचे ‘पासिंग पॉइंट’ बंद पडले आणि कोंडी वाढत गेली.
कार्यालयीन कर्मचारी आणि लांब पल्ल्याचे प्रवासी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगेत अडकून पडले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच महामार्ग पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली.
कोंडी फोडण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर १५ मिनिटांचा रणनीतिक वाहतूक ब्लॉक लागू करण्यात आला आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती थांबवून त्या रस्त्यावरील अतिरिक्त क्षमतेचा वापर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची रांग कमी करण्यासाठी केला जात आहे. कोंडीचा सर्वाधिक परिणाम पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर झाला आहे.
प्रवाशांना आवाहन
महामार्ग पोलीस युद्धपातळीवर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. प्रवाशांनी संयम बाळगावा, शक्य असल्यास प्रवास पुढे ढकलावा किंवा लोणावळा व खालापूर येथे काही वेळ थांबून पुढे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाल्याची अधिकृत माहिती मिळेपर्यंत पर्यायी नियोजन करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.