
नांदेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली असती, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे केला.
अमित शहा नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल विधान केले. तसेच यानिमित्ताने शिवसेनेवरही (ठाकरे) टीका केली. ऑपरेशन सिंदूरनंतर याची माहिती जगभरातील देशांना कळावी म्हणून मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशात पाठविण्याचा निर्णय घेतला. हे खासदार पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करत आहेत. पण शिवसेनेच्या (ठाकरे) एका नेत्याने मात्र ही कुणाची वरात जात आहे, अशी शेरेबाजी केली होती. त्याला शहा यांनी उत्तर दिले.
गृहमंत्री पुढे म्हणाले, मला समजत नाही की उद्धव सेनेला झाले तरी काय, एकेकाळी हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी मोदींची गळाभेट घेतली असती. पण उद्धव सेना सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला वरात म्हणते. ज्यात त्यांचेही खासदार विदेशात गेले आहेत, असेही शहा म्हणाले.
अमित शहा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदींनी हे सिद्ध केले की, हा नवा भारत आहे. २०४७ साली आपल्याला विकसित भारत तर बनायचे आहेच, पण असाही भारतही बनवायचा आहे ज्याच्याविरोधात कुणाचीही डोळे वटारून पाहण्याची हिंमत व्हायला नको, असेही ते म्हणाले.