रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या भीषण घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची माहिती जाणून घेतानाच सर्व पातळ्यांवर सहकार्य करण्याची भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. या संदर्भात शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. अमित शहा म्हणाले की, “महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफच्या ४ टीम घटनास्थळी पोहोचल्या असून, स्थानिक प्रशासनासह बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे.”