खासदार अमोल कोल्हेंचे तळ्यातमळ्यात

खासदार अमोल कोल्हेंचे तळ्यातमळ्यात

अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात बोलत असले, तरी त्यांची पक्षाबद्दलची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही,

मुंबई : राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले एक नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अजूनही अमोल कोल्हे द्विधा मनस्थितीत आहेत का? असाच प्रश्न त्यांच्या संशयास्पद भूमिकेवर निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर जी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये एकमेव अमोल कोल्हे असे आहेत ज्यांनी दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र दिल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर ज्यावेळी त्यांचा शपथविधी सोहळा झाला त्यावेळी सुद्धा अमोल कोल्हे उपस्थित राहिले होते. मात्र, नंतर त्यांनी भूमिका स्पष्ट करताना शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी जाहीरपणे अमोल कोल्हे यांना पाडण्याची भाषा केली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. इतके राजकीय घमासान होऊनही अमोल कोल्हे यांनी दोन्ही गटाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्राने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.

इतकेच नव्हे तर पाच आमदारांनीसुद्धा दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची मौन बाळगणे तसेच सोशल मीडियामध्ये व्यक्त न होणे, यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर संशयास्पद वातावरण निर्माण करणारे आहे.

अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात बोलत असले, तरी त्यांची पक्षाबद्दलची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही, हेच त्यांच्या मौनातून सूचित होत आहे का? अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचा निर्णय अजित पवार गटाच्या बाजूला गेल्यानंतर सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया सुरू असताना अमोल कोल्हे यांच्या ट्विटर हँडलवरती मात्र अजूनही एकही ट्विट झालेले नाही. त्यामुळे अमोल कोल्हे नेमके कोणाचे? असे विचारण्याची वेळ आता आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in