जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत ५६१० मुली बेपत्ता

पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. या मागील कारणे शोधली पाहिजेत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत ५६१० मुली बेपत्ता

महाराष्ट्रातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत ५६१० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे या मुली १८ ते २५ वयोगटातील आहेत.

एकट्या मार्च महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. म्हणजे दर दिवशी ७० मुली बेपत्ता झाल्या. फेब्रुवारीत १८१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुली अल्पवयीन असल्यास पोलीस तक्रार नोंदवतात. कायद्यानुसार, अल्पवयीन मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. त्यामुळे त्याचा डेटा पोलिसांच्या वेबसाइटवर टाकला जात नाही.

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण भयानक आहे. बेपत्ता नागरिकांना शोधणाऱ्या पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. या मागील कारणे शोधली पाहिजेत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

ग्रामीण भागात प्रमाण जास्त

मार्चमध्ये पुण्यात २२८, नाशिक १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१, सांगली ८२, यवतमाळ ७४, हिंगोली ३, सिंधुदुर्ग ३, रत्नागिरी १२, नंदुरबार १४, भंडारा १६ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

बेपत्ता मुली

जानेवारी- १६००

फेब्रुवारी-१८१०

मार्च-२२००

logo
marathi.freepressjournal.in