
ठाणे महानगर पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर रुग्णालय प्रशासनावर चोहोबाजुंनी टीका केली जात आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालया प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आता या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. मृत रुग्णांचे नातेवाईक या समितीसमोर स्वत: आपल्या तक्रारी मांडणार आहे. जेणेकरुन या प्रकरणाची चौहोबाजूंनी चौकशी करुन गठीत समितीला निष्कर्ष काढता येणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपाचारअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. हे प्रकरण ताजं असताना आता गेल्या १२ तासांत म्हणजे शनिवार रात्रीपासून ते रविवारी सकाळीपर्यंत या रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी मरण पावलेल्या रुग्णापैकी काही रुग्ण वयोवृद्ध होते. तर काही अन्य खासगी रुग्मालयातून अगदी अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी उपचार घेण्यासाठी आले असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
या प्रकरणातीच सत्यत कळणे आवश्यक आहे. निष्पक्षपणे चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीत आरोग्य संचालक, महापालिका आयुक्त,ठाणे जिल्हाधिकारी, जेजे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील दज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश आहे. तसंच या समितीत आवश्यकतेनुसार ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी घेण्यात येणार आहे. या चौकशीत रुग्णांवर आधीच्या रुग्णालयात केलेले उपचार, या रुग्णालयात केलेले उपचार, या रुग्णालयात आल्यावर त्यांची स्थिती काय होती. याची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे.