
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo) ही सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातून पुढे ही पदयात्रा येत्या काहीच दिवसात मध्य प्रदेशमध्ये दाखल होईल. अशामध्ये आता त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी इंदूरमध्ये येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच भारत जोडो यात्रेतील पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवून 'राहुल गांधी इंदोरमध्ये येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ,' ही धमकी देण्यात आली. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून अज्ञात इसमाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. येत्या २४ तारखेला त्यांची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशातील इंदूर येथे जाणार आहे. त्यामुळे हे पत्र कुणी दिले? पत्र कधी आणून ठेवलं याबाबतची काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.