मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवलं जीवन ; २३ वर्षीय नवनाथने घेतला गळफास

मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे. अशी चिठ्ठी या २३ वर्षीय तरुणाकडे सापडली आहे.
मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवलं जीवन ; २३ वर्षीय नवनाथने घेतला गळफास

मनोज जरांगे पाटील यांनी राज्या सरकारला दिलेल्या ४० दिवसांचा अवधी दिला होता. हे चाळीस दिवस संपून देखील सरकारने कोणतही ठोस पाऊल उचललं नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर राज्यातील मराठा समाज एकवटल आहे. राज्यातील काही गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. तर काही ठिकाणी रॅली काढून, उपोषण करुन, मोर्चे काढून, साखळी उपोषण करुन जरांगे यांना समर्थन दिलं जात आहे. जरांगे यांनी आरक्षणाची मागणी करताना मराठा तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, असं असताना देखील हिंगोलीत एका तरुणाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडी बाळापूर शेवाळा शिवारातील ही घटना आहे. मराठा समाजातील युवकाने चिठ्ठी लिहून झाडाला गळफास लावत जीव संपवल्याची घटना समोर आली आहे. नवनाथ उर्फ यशवंतराव कल्याणकर असं या मुलाचं नाव आहे. मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे. अशी चिठ्ठी या २३ वर्षीय तरुणाकडे सापडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ हा देवजणामध्ये राहत होता. शेतामध्ये काम करत होता. सोयाबीम कापणीचं काम करत असताना शेतशिवारात मळणी यंत्र सुरु ठेवत त्याने एकाएकी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. मळणी यंत्रामध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनचा घास अडकल्याने ट्रॅक्टर बंद पडत होतं. तेव्हा मजूरांनी त्यांना आवाज दिला. मात्र, आवाज दिल्यानंतर देखील नवनाथ कल्याणकर आढळून येत नसल्याने मजूरांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. यावेळी नवनाथ मजूरांना एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्यांना नवनाथच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यात त्यांनी मी मराठा आरक्षणामुळे जीव देत असल्याचं लिहिलेलं आढळून आलं.

logo
marathi.freepressjournal.in