कराड : पुसेसावळी (ता.खटाव) येथे दोन धार्मिक स्थळांना पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एका निरपराध युवकाचा जीव घेण्यात आला. हा भ्याड हल्ला होता. पूर्वनियोजित कट होता, असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, यासाठी आम्ही संविधानाच्या मार्गाने रस्त्यावरचा संघर्ष करत आहोत. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हिंदू एकता आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर याला अटक केली नाही तर २ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात शांतता फेरीचे आयोजन करण्यात येईल, असा इशारा मुस्लिम संघटनेचे जमीर शेख यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलवेळी पुसेसावळी हल्याच्या घटनेचा निषेध तोंडाला काळ्या पट्या लावून करण्यात आला.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुस्लिम समाजाच्या समर्थनार्थ डाव्या संघटनांच्यावतीने विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, वसंतराव नलावडे, उमेश खंडूझोडे, दलित महिला मंडळाच्या ॲड. वर्षा देशपांडे, शैला जाधव, कैलास जाधव, मिनाज सय्यद, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिसे, प्रा. दत्ता जाधव, माणिक अवघडे, शिवाजी पवार,ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या रजनी पवार, डॉ.राजश्री सय्यद, मनोज चाकणकर, रिपाइंच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्यासह मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. घडलेल्या हल्याची सर्वसामावेश सत्यशोधन समिती नेमून चौकशी करण्यात यावी,अल्पसंख्याक समाजाविषयी भडकावू वातावरण तयार करणारे सुत्रधार विक्रम पावसकर यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.