स्वत:चा काळ आला असतानाही एसटीतील तब्बल २५ प्रवाशांची सुखरूप वाहतूक

गावाच्या हद्दीत आल्यानंतर गाडीचा वेग अचानक मंद झाला. त्यावेळी त्यांचे सहकारी वाहक संतोष गवळी यांनी केबिनजवळ जाऊन...
स्वत:चा काळ आला असतानाही एसटीतील तब्बल २५ प्रवाशांची सुखरूप वाहतूक

स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलले कर्तव्य पार पडणाऱ्या अनेक घटना आपल्या ऐकिवात असतात. अशी एक घटना ३ ऑगस्ट रोजी पुणे-सातारा महामार्गावर घडली. स्वत:चा काळ आला असताना एसटी चालक जालिंदर पवार या चालकाने एसटीमध्ये बसलेल्या तब्बल २५ प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित केले आणि त्यानंतरच जगाचा निरोप घेतल्याची घटना घडली.

३ ऑगस्ट रोजी वसई-म्हसवड (सातारा) ही एसटी बस (एमएच १४ बीटी ३३४१) दुपारी १.३० च्या सुमारास स्वारगेट स्थानकात आली. तेथे चालकांची बदली झाली आणि गाडीचा ताबा जालिंदर रंगराव पवार (वय ४५, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी घेतला. त्यानंतर गाडी म्हसवडच्या दिशेने रवाना झाली. पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्याच्या पुढे वरवे गावाच्या हद्दीत आल्यानंतर गाडीचा वेग अचानक मंद झाला. त्यावेळी त्यांचे सहकारी वाहक संतोष गवळी यांनी केबिनजवळ जाऊन त्यांना गाडीचा वेग कमी का केला असे विचारले, त्यावेळी पवार यांचा चेहरा घामाने भिजून गेला होता, मला चक्कर येत आहे असे सांगितले. त्यांना असह्य वेदना होत असतानाही गाडीवरचे नियंत्रण पवार यांनी सोडले नाही आणि गाडी सावकाश रस्त्याच्या डाव्या कडेला लावली व सुरक्षित थांबविली. त्यावेळी त्यांच्या छातीमध्ये प्रचंड कळ आली आणि त्यांनी स्टेअरिंगवरच डोके ठेवले. त्यांना उठविण्यासाठी वाहक गवळी केबिनमध्ये धावून आले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उठले नाहीत. त्यानंतर गाडीचा ताबा एका प्रवाशाने घेतला व गाडी तातडीने जवळच असलेल्या नसरापूर येथील सिद्धिविनायक येथील रुग्णालयात नेली. पंचवीस प्रवाशांसह गाडी रुग्णालयात पोचली. मात्र सर्व प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी अगदी वेळेवर एसटी बाजूला उभी करणाऱ्या जालिंदर यांना मात्र रुग्णालयात उपचारासाठी वेळेत पोहोचता आले नाही आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हृदयविकाराचा तीव्र झटका तरी कर्तव्याला प्राधान्य

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर अनेकांनी चालक आणि वाहकांबाबत चुकीची वक्तव्ये केली. परंतु या सर्व वक्तव्याना लाजवेल अशी घटना पुणे-सातारा महामार्गावर घडली. हृदयविकाराच्या तीव्र कळा जाणवत असूनही चालक जालिंदर पवार यांनी ते सहन करत प्रवाशांना सुखरूप नेले. या वेदनेत एसटीवरील नियंत्रण सुटले असते तर कदाचित एसटीचा अपघातही झाला असता. त्यामुळे एसटीतील २५ प्रवाशांबरोबर बाहेरील वाहनांच्या अपघाताची शक्यताही निर्माण झाली असती. मात्र जालिंदर यांच्या कर्तव्यदक्ष स्वभावाने मृत्यूलाही थोडा वेळ बाजूला ठेवले आणि त्यांनी प्रवाशांना सुरक्षित करून त्याच स्टेअरिंगवर देह ठेवला. या घटनेमुळे अनोळखी चालकासाठीही एसटीतील सर्व प्रवाशांचे डोळे पाणावले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in