
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांच्या वतीने राज्यभरात निदर्शने करण्यात येत असताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील मुंबई काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेत कार्यकर्त्यांना चोप दिला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. राज्यात भाजप युतीची सत्ता येताच गुंडागर्दी वाढली असून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचा हल्लाबोल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केला.
करोडो लोकांचे देव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. मानवता, माणुसकी माहिती नव्हती त्यांना ती डॉ. आंबेडकर यांनी शिकवली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी.
- विजय वडेट्टीवार,काँग्रेस आमदार