

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभागाने राबविलेल्या १०५ दिवसांच्या विशेष मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तथापि, अमराठी चालकांची मागणी लक्षात घेऊन त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दिली.
मराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी प्रवाशांशी व्यावहारिक मराठी भाषेतून संवाद साधावा यासाठी परिवहन विभागाने मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रम राबवला आहे. मात्र, या उपक्रमात काही रिक्षाचालकांनी अद्याप भाग घेतलेला नाही. मराठी प्रशिक्षणाला विरोध करत मुंबईतील काही उपनगरात रिक्षा चालकांनी आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्रालयात सरनाईक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सरनाईक यांनी अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी मुदत देत असल्याचे जाहीर केले.
चालकांसाठी कार्यशाळा सुरू ठेवणार
परिवहन विभागाने राबविलेल्या विशेष मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ८०० रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. परंतु, अद्यापही मराठीचे प्रशिक्षण न घेतलेल्या चालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.
नकार दिल्यास बॅज रद्द करणार
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यात येणार आहे. प्रारंभी संबंधित चालकांना एक महिन्याची मुदत, त्यानंतर आवश्यक असल्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. या काळात चालकांना मराठी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. या प्रक्रियेत संबंधित कायद्यानुसार बॅज निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते. मात्र, या तीन महिन्यांच्या कालावधीत बॅज रद्द केला जाणार नाही. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा सरनाईक यांनी दिला. यावेळी कामगार नेते शशांक राव, तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.