
मुंबई : वादग्रस्त विधाने आणि मंत्री नितेश राणे हे जणू समीकरणच बनले आहे. आता नागपूरमधील हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याची तंबी दिली आहे.
नितेश राणे यांनी मंगळवारी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिले. मात्र, मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझे नाव आहे, असे स्पष्टीकरण नंतर नितेश राणे यांनी दिले. “मी मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आलो होतो. मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या यादीत आहे, त्यामुळे चिंता करू नका. मी अन्य मंत्र्यांसारखा नाही,” असेही राणेंनी सांगितले.
वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस पुढे सरसावले असून त्यांनी नितेश राणेंना कार्यालयात बोलावून तंबी दिल्याचे सूत्रांकडून समजते.