"...मग सरकारच्या विरोधात उपोषण कशाला?" लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर बबनराव तायवाडेंची टीका

"आम्ही सरकारकडून लिहून घेतलं आहे की, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्रदेखील देणार नाही..." नेमकं काय म्हणाले बबनराव तायवाडे?
"...मग सरकारच्या विरोधात उपोषण कशाला?" लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर बबनराव तायवाडेंची टीका
Published on

'ओबीसी आरक्षण बचाव'साठी लक्ष्मण हाकेंचं अंतरवालीतील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे. ओबीसी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या ओबीसी आंदोलनावर टीका केली आहे. सरकारनं ओबीसी महासंघाला लिखित आश्वासन दिलेलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं लिखित आश्वसन असताना आंदोलन करण्याची गरज काय? असा सवाल तायवाडे यांनी उपस्थित केला.

आम्ही सरकारकडून लिहून घेतलंय...

लक्ष्मण हाके सध्या ओबीसींसाठी आंदोलन करतायत, त्यांच्या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ का सहभागी होत नाही, असा प्रश्न बबनराव तायवाडे यांना विचारण्यात आला. त्यावर स्पष्टीकरण देताना तायवाडे म्हणाले की, "आम्ही सरकारकडून लिहून घेतलं आहे की, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्रदेखील देणार नाही. हे आमच्याकडे लिखित आहे. आम्ही सरकारकडून अशाप्रकारे लिखित घेतलं आणि त्यावर सरकार आजपर्यंत ठाम आहे. तेव्हा माझ्यावर आरोप करणारे कुठं होते? ते जन्मालाही आले नव्हते."

मग सरकारच्या विरोधात उपोषण कशाला?

तायवाडे पुढं म्हणाले की, "आम्हाला जे सरकारनं लिहून दिलं, त्यावर आजही सरकार ठाम आहे, मग सरकारच्या विरोधात उपोषण कशाला, हा माझा प्रश्न आहे. आम्ही आजही वेट अँड वॉचच्या भुमिकेत आहोत. जेव्हा सरकार आपला शब्द फिरवत आहे, असं आमच्या लक्षात येईल, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू. परंतु सध्यातरी सरकार त्यांच्या शब्दावर ठाम आहे, त्यामुळं सध्यातरी सरकारला कोणत्याही आंदोलनाची गरज नाही," असं ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in