आमच्या वाट्याला गेलात तर सोडणार नाही, प्रहार हा आंडूपांडूचा पक्ष नाही

बच्चू कडूंचे अमरावतीत शक्तिप्रदर्शन; म्हणाले...
आमच्या वाट्याला गेलात तर सोडणार नाही, प्रहार हा आंडूपांडूचा पक्ष नाही
@RealBacchuKadu
Published on

गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यामध्ये वाद सुरु होता. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. यानंतर आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर आता अमरावतीमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"आरोप करणाऱ्यांची पहिलीच वेळ आहे म्हणून माफ करतो. पण, यापुढे आमच्या वाट्याला गेलात तर सोडणार नाही. असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी मेळाव्यामध्ये भाषण करताना दिला. त्यांनी म्हंटले की, "प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही. प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद आहे. वार करण्याची क्षमता आमच्यामध्येही आहे. आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही आणि गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारू नका. सत्ता गेली चुलीत. आम्हाला काही फरक पडणार नाही" अशा तिखट शब्दात त्यांनी टीका केली.

पुढे ते म्हणाले की, "मी जेव्हा निवडणुकीला बाहेर पडलो, तेव्हा कुठल्याही बिल्डराच्या घरी गेलो नाही. आम्ही मंदिर, मशीद, धर्म, जातीचे राजकारण केले नाही. गोरगरीब, अपंगांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले, त्यांचा कधी राजकारणासाठी वापर केला नाही. राजकारण आणि तत्त्वांची सांगड घालता आली पाहिजे."

logo
marathi.freepressjournal.in