
अमरावती : भाजप आणीबाणीपेक्षाही वाईट वागली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. हे लोक खरेच रामाचे भक्त असतील तर त्यांनी आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नेता नाही का? हे सांगावे, असा खडा सवाल ‘प्रहार’ संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपला केला आहे.
संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते. पण याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या २ दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आल्याने खळबळ माजली आहे. या उधळपट्टीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, सध्या सरकारमध्ये अत्यंत भावनाशून्य लोक बसले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाहीत. आज राज्यात दररोज १०-१५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. रोजगार हमीच्या मजुरांना वेळेवर पगार मिळत नाही.
भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नेता नाही का?
एकीकडे पैसे नसल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे उधळपट्टी करायची. भाजपचा सत्तेवरचा अंकुश आता सुटलेला आहे. कसायाने एकदा चारा खाऊ घालायचा आणि दररोज गाई-म्हशी कापायच्या असा हा प्रकार आहे. तुम्ही वेगळे काय करता? तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तर सांगा भाजपच्या एकाही नेत्याची आजपर्यंत ईडी चौकशी का झाली नाही? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? तुम्ही आणीबाणीपेक्षाही वाईट वागता आहात, हे संपूर्ण देशाला माहिती आहे, अशी टीका कडू यांनी केली.