धाराशिव : बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्याच्या मागणीवरुन धाराशिवमधील मुरुम गावच्या युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. नाईक नगर तांडा येथे ३२ वर्षीय पवन गोपीचंद चव्हाण याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर तरुण बेरोजगार पदवीधर असून त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याच गॅझेटप्रमाणे गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण द्या, अशी मागणी होत आहे. बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावे, अशा आशयाची सुसाईड नोट मृत युवकाने लिहिली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घरातील मंडळींनी पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर मुरूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यावेळी मृतदेहाशेजारी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये समाजाला न्याय द्यावा, असा उल्लेख आहे. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती समजताच परिसरातील बंजारा समाजाचे शेकडो नागरिक घटनास्थळी जमले तातडीने सरकारकडे मागणी मान्य करण्याचे आवाहन केले. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात सातत्याने आंदोलने होत आहेत. विशेषतः हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या प्रकरणी राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय न घेतल्याने समाजातील तरुण निराश होत असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.