
अंबाजोगाई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सौंदाना गावातील सरपंचाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे.
परळी तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शनिवारी (११ जानेवारी) रात्री परळीच्या दिशेने जात होते. यावेळी साडेआठच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली. या धडकेत क्षीरसागर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असताना महिनाभरात दुसऱ्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा अपघात की घातपात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहिजे. संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही राखेची अवैध वाहतूक करणारे टिप्पर बंद झालेले नाहीत. याला परळी पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत.
बीडला केंद्रशासित प्रदेश करा - विनायक राऊत
बीडमध्ये सातत्याने होणाऱ्या हत्या हा गंभीर विषय बनला आहे. कालही एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला. पण तीही हत्याच वाटते. गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरपंचांच्या जीवावर भ्रष्टाचारी टोळके उठले आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बीड जिल्ह्याला केंद्रशासित प्रदेश करून तुमच्या अधिपत्याखाली ठेवावा. तरच तिथे काही बदल होतील, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे.