

रमेश जाधव/रांजणी
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागासह बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा तेरुंगण येथील पाझर तलाव अखेर शंभर टक्के क्षमतेने भरला आहे. मुसळधार पावसामुळे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे श्री क्षेत्र भीमाशंकरसह परिसरातील हजारो ग्रामस्थ, आदिवासी, भाविक आणि पर्यटकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या या परिसरात यंदा मात्र समाधानाचे वातावरण आहे.
उन्हाळ्याच्या अखेरीस तलावाचा तळ दिसू लागल्याने भीमाशंकर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक आदिवासी वाड्यांमधील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत होती. काही ठिकाणी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले होते. तेरुंगण पाझर तलाव हा भीमाशंकर परिसराचा प्रमुख जलस्रोत मानला जातो. या तलावातून श्री क्षेत्र भीमाशंकरसह निगडाळे, तेरुंगण, म्हातारबाचीवाडी, ढगेवाडी आणि परिसरातील अन्य गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. श्रावणात लाखो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत
असल्याने या तलावाचे महत्त्व अधिक वाढते. तलाव पूर्ण भरल्यामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसरातील वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सुमारे ६.६० एमएसएफटी क्षमतेची आहे.
शेतकरी वर्गात समाधान व्यक्त
पिण्याच्या पाण्याबरोबरच या जलसाठ्याचा फायदा शेती क्षेत्रालाही होणार आहे. पश्चिम आदिवासी भागातील भातशेतीला यामुळे मोठा आधार मिळणार असून, भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. सध्या तलाव परिसर हिरवाईने नटला असून, ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पावसाळी पर्यटनाला चालना मिळाल्याने भीमाशंकर परिसरातील स्थानिक व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.