"आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला...", भुजबळांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा निशाणा

मराठ्यांना ओबीसीत सामील करुन घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाहीत. तुमचे स्टेटमेंट बिनबुडाचे आहे. आपण राज्याचे मंत्री म्हणून...
"आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला...",  भुजबळांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्य सरकारने आज काढलेल्या अध्यादेशावर नाराजी व्यक्त करत हा मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसीमध्ये समावेश करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले. यावरुन मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. "खरोखर संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला का?", असा सवाल त्यांनी भुजबळांना केला आहे. तसेच, आपण जबाबदार मंत्री असून असे तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत असल्याचेही ते म्हणाले.

आपण जबाबदार मंत्री आहात-

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना आजचा निर्णय मान्य नाही. ते न्यायालयीन लढाई लढणार आहेत. असे म्हणत विनोद पाटील यांनी भुजबळांना प्रश्न विचारले आहेत. "खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे का? खरंच ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या का? भुजबळ साहेब आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हालादेखील खरी हकीकत माहित आहे. तरी देखील विनाकारण तेढ निर्माण करणारे वक्तव्य आपण करत आहात", असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. विनोद यांनी एक्सवर याबाबतची पोस्ट केली आहे.

मराठ्यांना ओबीसीत घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाही-

मराठ्यांना ओबीसीत सामील करुन घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाहीत. तुमचे स्टेटमेंट बिनबुडाचे आहे. आपण राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. असेही ते म्हणाले. तसेच, ज्यांच्या नोंदी नाहीत, अशा सर्वांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढणार असून क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने येईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले भुजबळ?

आज राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशावर बोलताना भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ही एक सूचना आहे, नोटीस आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या हरकती पाठवाव्या, जेणेकरुन सरकारला याची दुसरी बाजू लक्षात येईल. नुसते एकमेकांवर ढकलून किंवा चर्चा करून चालणार नाही, प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे म्हणत बॅकडोर एन्ट्रीने प्रयत्न करत येतात, पण त्याच्यामुळे 50 टक्क्यांमध्ये तुमची संधी होती ती गमावून बसता, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in