विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. वारकऱ्यांचा सण असलेली आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. हे दोन्ही सण सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केले जातात. अशात आता संभाजीनगरमध्ये हिंदु-मुस्लिम एकतेच मोठ उदाहरण समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज भागातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात, आला आहे. मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
येत्या २९ जून रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. तर त्याच दिवशी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण देखील साजरा केला जाणार आहे. दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने पोलिसांकडून हे सण शांततेत साजरी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर वाळूज येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत २९ जून आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला. तसंच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी कुर्बानी करणार असलल्याचं देखील या बैठकीत ठरवण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर भागात असलेल्या पंढरपूर गावात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे मंदिर आहे. आषाढीला या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आषाढीच्या दिवशी पहाटे पाच वाजेपासून भाविक या पंढरपूर गावात दाखल होत असतात. या दिवशी या ठिकाणी शेकडो दिंड्या येतात. पोलिसांचा देखील चोख बंदबस्त या ठिकाणी तैनात असतो. दरम्यान, याच दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाची राज्यभर चर्चा होत आहे.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी असल्याने यंदा कुर्बानी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करावी अशी विनंती छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केली होती. दरम्यान, मुस्लिम बांधवांनी मन मोठ दाखवत आषाढीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला.