सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला हिरवा कंदील दाखवला असून आता शिवसेना कोणाची आणि पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार याचा निर्णय घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे, तर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.शिवसेनेची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला त्यांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. ठाकरे गटाने दोनवेळा मुदतवाढीची मागणी केली होती. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रीन सिग्नलनंतर केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर निर्णय घेणार आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ मागितली जाणार का, हे पाहावे लागेल. येत्या महिना किंवा दीड महिन्यात शिवसेना याबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.