जरांगेंच्या 'त्या' इशाऱ्यानंतर राणेंची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत म्हणाले - "औकात ओळखावी आणि..."

'सरकारने निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही', असा इशारा जरांगेंनी मंगळवारी दिला होता.
जरांगेंच्या 'त्या' इशाऱ्यानंतर राणेंची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत म्हणाले - "औकात ओळखावी आणि..."

मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. 'सरकारने निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही', असा इशारा जरांगेंनी मंगळवारी दिला होता. त्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.

"मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही", असे राणे यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे.

"देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !", असेही राणेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. तरीही ते उपचार घेण्यास नकार देत आहेत. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे जरांगे-पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जरांगेंच्या समर्थनार्थ आज मराठवाड्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in