'वंदे भारत'वरून संभाजीनगर रेल्वे स्थानकावर राडा, भाजप-एमआयएमचे कार्यकर्ते आले समोरासमोर

खासदार इम्तियाज जलील यांचे संभाजीनगर स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली, तर पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनबाहेर काढले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले.
'वंदे भारत'वरून संभाजीनगर रेल्वे स्थानकावर राडा, भाजप-एमआयएमचे कार्यकर्ते आले समोरासमोर

संभाजीनगर : जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटनावरून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर एमआयएम आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. खासदार इम्तियाज जलील यांचे संभाजीनगर स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली, तर पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनबाहेर काढले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन शनिवारी होणार होते. पण, या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर खासदार इम्तियाज जलील यांचे नाव नसल्याने जलील आक्रमक झाले. त्यांनी भाजपवर टीका केली. त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे आगमन होणार होते. त्यापूर्वी इम्तियाज जलील हे रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली, तर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

जलील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “लोकशाही मार्गाने माझा निषेध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा आम्ही हातात घेतला नाही. भाजपने हा रेल्वेचा कार्यक्रम न ठेवता पक्षाचा कार्यक्रम केला आहे. सगळ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त ‘मोदी-मोदी’ हेच काम यांना राहिलं आहे. पोलिसांनी बळजबरीनं माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. माझ्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाताना रेल्वे थांबवली, तर याची जबाबदारी पोलिसांची असेल. आमच्या लोकांना बाहेर काढण्यात येत असेल, तर भाजपच्या लोकांनाही बाहेर काढा. रेल्वे स्टेशन भाजपची मालमत्ता नाही,” अशी टीका जलील यांनी केली आहे.

ज्यांचं सरकार, त्यांचंच श्रेय -भुमरे

पालक मंत्री संदीपान भुमरे म्हणाले, “संभाजीनगरला सुसज्ज अशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मिळाली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रोटोकॉलनुसार रेल्वे विभागाने पत्रिकेत नावे टाकली असतील. पत्रिकेत कुणाचं नाव आहे-नाही, हे मी पाहिलं नाही. ज्यांचं सरकार असतं, ते श्रेय घेण्याचं काम करतं. जलील विरोधी पक्षाचं काम करतात.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in