अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
कर्डिले मोठ्या आजारातून नुकतेच बरे झाले होते. शुक्रवारी पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या गावातील शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. दूध उत्पादक शेतकरी, सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
शिवाजीराव कर्डिले २००९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभे होते. त्यांनी ५७ हजार ३८० मते मिळवून विजय संपादन केला होता. २०१४ मध्येही ९१ हजार ४५४ मतांनी विजय मिळवला होता. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
५२.५४ टक्के मते
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून विजय मिळवला आणि सध्या आमदार म्हणून कार्यरत होते. भाजपकडून लढताना ते १ लाख ३४ हजार ८८९ मतांनी जिंकले होते. त्यांना एकूण मतदानाच्या ५२.५४ टक्के मते पडली होती.
अटक अन् सुटका...
२०१८ मध्ये शिवाजीराव कर्डिले यांना अहमदनगर पोलिसांनी शिवसेना नेते संजय कोटकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक केली होती. याशिवाय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला आणि त्यांनी राजकारणात पुनरागमन केले.
कर्डिले यांनी सुरुवातीला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ ते गावचे सरपंच होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले.
कुटुंब राजकारणात
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर संदीप कोतकर हे कर्डिले यांचे जावई आहेत. आता कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.