छत्रपती संभाजीनगर लोकसभेवर भाजपचा दावा ; शिंदे गट माघार घेणार ?

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर उघडपणे दावा केला आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेवर भाजपचा दावा ; शिंदे गट माघार घेणार ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या लोकसभा मतदार संघावर दावा करत आहे. अशा भाजप आणि शिवसेना(शिंदे गट) युतीकडे असलेल्या छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजकडून हालचाली केल्या जात आहेत. भाजप नेत्यांनी याबाबत अनेकदा बैठका देखील घेतल्या होत्या. मात्र, आतापर्यंत त्यांनी उघड दावा या मतदारसंघावर केला नव्हता. पण, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर उघडपणे दावा केला आहे. शिवसेनेत गटबाजी असल्याने त्यांची ताकद आता या मतदार संघात कमी झाली असल्याचं सांगत भाजपला हा मतदारसंघ सोडण्याची मागणी कराड यांनी केली आहे.

यावर बोलताना भागवत कराड म्हणाले की, छंत्रपती संभाजीनगर ग्रामीण असेल किंवा शहर, सर्वांचीच इच्छा आहे की, या लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने लढावी. भाजपच्या बूथ प्रमुखांपासून तर लोकसभा प्रभारीपर्यंत सर्वच यासाठी रात्र-दिवस काम करत आहेत. शिवसेनेत एकनाथ शिदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांची ताकद नक्कीच कमी झाली आहे. दुसरीकडे भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे. त्यामुळे ही जागा भाजपाल मिळावी अशी सर्वांची इच्छा आहे. तर, मी सुद्धा इच्छुक उमेदवार आहे, असं कराड म्हणाले.

या जागेवर आतापर्यंत भाजप शिवसेना युतीचा ताबा राहीला आहे. युतीचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सलग चारवेळा या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. २०१९च्या लोकसभेत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. आता शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गट भाजपसोबत आहे. तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडेच राहील असा दावा शिंदेगटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यापुर्वीच केला आहे. मात्र, आता भाजपने देखील या जागेवर दावा सांगितल्याने शिंदे गट माघार घेईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in