

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजने अंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दिवार पेंटीगच्या माध्यमातून, ‘एक बार फिर से मोदी सरकार’ असा संदेश देण्यास प्रारंभ झाला आहे. शिर्डी मतदार संघात दिवार पेंटिंग करण्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
चिंचपूर गावातून सुरू झालेल्या या कार्यक्रमास पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा सहकारी बॅकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, गिताराम तांबे, निवृत्ती सांगळे, भाऊसाहेब जऱ्हाड, बापूसाहेब गायकवाड, अशोकराव म्हसे, सहाय्यक कामगार आयुक्त एन. के. कवले, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत मेळावे, बुथ संमेलन, महिलांचे शक्तीवंदन संमेलन तसेच युवा मोर्चाच्या माध्यमातून नव मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. दिवार उपक्रमाच्या माध्यमातून ‘एक बार फिरसे मोदी सरकार’ असा संदेशही आता पक्षाने देण्यास प्रारंभ केला असून, पक्षाचे चिन्ह आणि मोदी सरकार पुन्हा आणण्याचे आवाहन या संदेशातून करण्यात येत आहे. लोणी बुद्रूक येथेही कार्यकर्त्यांनी दिवार पेंटींग उपक्रमाचा शुभारंभ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार तिस-यांदा सत्तेवर येणार आहे. प्रधानमंत्र्यांनी मागील दहा वर्षात जनसामान्यांसाठी राबविलेल्या योजना तसेच देशाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय याचा सकारात्मक संदेश मतदारांपर्यंत गेलेला आहे. आत्मविश्वास वाढावा म्हणूनच दिवार पेंटींग अभियानाच्या माध्यमातून ‘एक बार फिरसे मोदी सरकार’ हा संदेश पक्षाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवत आहे.
- शालिनी विखे-पाटील