शालेय बोगस आयडीप्रकरणी शिक्षण उपसंचालकाला अटक

राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आहे.
शालेय बोगस आयडीप्रकरणी शिक्षण उपसंचालकाला अटक
Published on

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या एसआयटीने छत्रपती संभाजीनगर इथून त्याना ही अटक करण्यात आली असून त्यांना नागपुरात नेण्यात आले आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय शिक्षण मंडळ सचिव पदावर कार्यरत असलेल्या वैशाली जामदार या उल्हास नरड यांच्या पूर्वी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक होत्या. तपासादरम्यान त्यांच्या कार्यकाळात नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाव्दारे बनावट कागदपत्राचे आधारे अपात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यास मान्यता देण्याचा ठराव करण्यात आला आणि फेरबदल करुन शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावरून या घोटाळा प्रकरणी नियुक्त विशेष तपास पथकाने त्यांना हजर राहण्याची नोटीस दिली होती. दरम्यान, विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थान येथून त्याना ताब्यात घेतले होते. यानंतर कोर्टातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना नागपूर येथे आणण्यात आले आहे.

बोगस शिक्षकांशी संबंधित शालार्थ आयडी म्हणजेच त्यांचा वेतन देण्यासाठीच्या संगणिकृत प्रक्रिये संदर्भात अनेक डिव्हाईस (डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल फोन) वेगवेगळ्या लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ॲड्रेसद्वारे वापरले गेल्याचे दिसून येत आहे. तर मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकेशन्स किंवा आयपी ॲड्रेस किंवा डिवाइस वापरले गेल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे सायबर सेल समोर या घोटाळ्याचा तपास करणे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या ५८० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शिक्षण विभागातील ५८० शिक्षक भरती घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल ५८० शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा काळाबाजार उघड झाला आहे. दरम्यान, या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आलेले आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in