सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड, हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल

राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे.
सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड, हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल
Published on

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शनिवारी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांच्याकडे यापूर्वी झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. दरम्यान भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपनं अलीकडच्या काळात अनेक ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं हरिभाऊ बागडे या ज्येष्ठ नेत्याचं राजस्थानच्या राज्यपालपदी निवड करून एकप्रकारे पुनर्वसन केलं आहे. दरम्यान हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा राजकीय विश्वात रंगू लागली आहे.

'या' राज्यांना मिळाले नवे राज्यपाल?

  • राजस्थान- हरिभाऊ किसनराव बागडे

  • तेलंगणा- जिष्णू देव वर्मा

  • सिक्कीम- ओम प्रकाश माथूर

  • झारखंड- संतोष कुमार गंगवार

  • छत्तीसगड- रामेन डेका

  • मेघालय- सी. एच. विजयशंकर

  • महाराष्ट्र- सी. पी. राधाकृष्णन

  • पंजाब- गुलाब चंद कटारिया (चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती)

  • आसाम आणि मनिपूर- लक्ष्मण प्रसाद आचार्य

दरम्यान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी बनवारीलाल पुरोहित यांचा पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, वरील नियुक्त्या त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील त्या तारखांपासून कामकाज सुरू होईल.

कोण आहेत सी.पी.राधाकृष्णन?

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते, जनसंघाच्या काळापासून ते संघटनेशी संलग्न

  • दक्षिण भारतात भाजप पक्ष संघटनेच्या वाढीसाठी मोठं काम

  • तामिळनाडूच्या कोईम्बतूरमधून १९९८ आणि १९९९ अशा दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले.

  • त्यानंतर २००४, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा कोईम्बतूरमधून पराभव

  • विद्यार्थी चळवळीपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात

  • भाजपच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही पार पाडली

  • २००७ मध्ये तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष असताना ९३ दिवस १९,००० किलोमीटरची रथ यात्रा काढली

  • त्यात त्यांनी नद्या जोडणे, दहशतवाद, समान नागरी कायदा, अस्पृश्यता आणि ड्रग्ज अशा मुद्द्यांकडं लक्ष वेधलं

  • त्यांनी धरण आणि नदीच्या मुद्द्यावर २८० किलोमीटर आणि २३० किलोमीटर अशा दोन पथ यात्रा

  • २०२३ मध्ये झारखंडच्या राज्यपाल पदी नियुक्ती

logo
marathi.freepressjournal.in