रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त दिवाळी साजरी करा; खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आवाहन

२२ जानेवारी रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपणा वेळी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी आपापल्या घरात मिष्ठान्न तयार करावेत.
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त दिवाळी साजरी करा; खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आवाहन

नांदेड : तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लांचे पुन्हा एकदा अयोध्या नगरीतील राम मंदिरात आगमन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमातून सोमवारी (दि. २२) प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरात दिवाळी साजरी करावी. देव्हाऱ्यात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची आणि गावातील प्रत्येक मंदिरावर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची अथवा प्रतिमेची पूजा करावी. शोभायात्रा काढाव्यात. भगवे ध्वज फडकवावेत, असे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर शुक्रवारी (दि. १९) यांनी केले.

खासदार चिखलीकर यांच्या साई सुभाष या संपर्क कार्यालयात आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांना रामज्योतींचे वाटप करण्यात आले. यावेळी ते जनतेशी आणि माध्यमांशी संवाद साधत होते.

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे आयोध्या नगरीत राम मंदिर व्हावे, ही सबंध भारतीयांची इच्छा होती. मात्र, गेल्या साठ वर्षाच्या काळात भारतीयांच्या इच्छेला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मूठमाती दिली होती. प्रभू रामचंद्रांचे अयोध्येत आगमन कधी होणार यासाठी तमाम हिंदुस्थानातील नागरिक आतुरतेने वाट पाहत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून अखेर अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभे राहत आहे. या भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे आगमन येत्या २२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.

देशभरातील तमाम हिंदू बांधवांसाठी आणि भारतीयांसाठी हा क्षण सुवर्णक्षण असणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण भारतभरात दिवाळी साजरी व्हावी अशी, अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवली आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपणा वेळी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी आपापल्या घरात मिष्ठान्न तयार करावेत. देव्हाऱ्यात प्रभू रामचंद्रांची प्रतिमा ठेवून पूजा करावी. गाव - गावात सार्वजनिक भजन, कीर्तनाचा आणि शोभायात्रांचा कार्यक्रम आयोजित करावा. पारावर प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून तिचे पुष्प पूजन आणि धूप पूजन करण्यात यावे. घराघरावर भगव्या पताका फडकवाव्यात, अंगणात रांगोळ्या काढाव्यात. सर्वत्र राममय आणि भगव वातावरण झाले पाहिजे यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन खा. चिखलीकर यांनी केले. या वेळी त्यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि माध्यम प्रतिनिधींना रामज्योतींचे वाटप करण्यात आले.

यावेळी धर्मराज देशमुख, राजेश कुंटूरकर, मिलींद देशमुख, सौ.प्रणिताताई देवरे, गंगाधराव जोशी, बालाजी बचेवार, बाळू खोमने, दिपकसिंह रावत, विनय सगर, लक्ष्मणराव इंगोले रविंद्र पोतगंटीवार, प्रविण साले, विजय गंभीरे, बालाजी पाटील कासरखेडकर, लक्ष्मणराव ठक्करवाड सुशिल चव्हाण, औरादकर व सर्व तालुका प्रमुख व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in