राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्र राज्याचा विकास झपाट्याने होत असून चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे म्हणून तयार होत आहेत. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर भर दिला असून दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा विकास झपाट्याने होत असून चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे म्हणून तयार होत आहेत. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर भर दिला असून दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नावीण्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहात, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे उपस्थित होते.

ज्या ठिकाणी उत्खनन होते तेथील नागरिकांना खनिज निधीचा फायदा झाला पाहिजे, अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे जो त्रास स्थानिकांना होतो त्यामुळे सर्वात जास्त लाभ स्थानिकांनाच मिळाला पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याने खनिज क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत.

चंद्रपूरने वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट गाठावे!

५० कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरीत्या राबवली असल्याने यावेळी देखील चंद्रपूरने वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट गाठावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र राज्याने ग्रीन कव्हर वाढवले असून परिसर नैसर्गिकरीत्या समृद्ध केला आहे. मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांच्या वर नेण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधीतून अतिशय चांगले काम केल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in