

मुंबई : सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हा रोजगार हजारो कुटुंबांचा आधार असून व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल, अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत, अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिली.
तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना, मी जर सावजी मटण खाल्ले तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे सावजी रेस्टॉरंट चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी मुंढे यांचे नाव न घेता त्यांना समज दिली.
विदर्भामध्ये गेली तीन-चार पिढ्यांपासून सावजी रेस्टॉरंट्स अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहेत. सावजी ही मसाला आणि अन्नपदार्थ बनवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धती आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावजीच्या जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो, असेही ते म्हणाले.