तेलगी प्रकरणात माझी नाहक बदनामी ;छगन भुजबळ यांनी व्यक्त केले शल्य

माझी काही चूक नसताना राजीनामा घेण्यात आला आणि माझ्या नावाची बदनामी झाली
तेलगी प्रकरणात माझी नाहक बदनामी ;छगन भुजबळ यांनी व्यक्त केले शल्य

नाशिक : तेलगी मुद्रांक घोटाळ्यात राजीमाना द्यावा लागलेले मंत्री छगन भुजबळ यांनी आता या प्रकरणात काहीच दोष नसताना माझा नाहक बळी गेला, असे शल्य बोलून दाखवले आहे. कोणत्याही आरोपपत्रात माझे नाव नसताना माझा राजीनामा घेतला गेला. माझी नाहक बदनामी झाली, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ तेलगी घोटाळा प्रकरणात कोणतीही चूक नसताना नाहक बदनामी झाल्याचे शल्य आजही मनात असल्याचे सांगताना म्हणाले, ‘‘मी गृहमंत्री असताना अब्दुल करीम तेलगीला मोक्का लावला होता. त्याची सीबीआय चौकशी झाली. तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार होते. सीबीआयने दोन आरोपपत्रे दाखल केली, त्यात माझे नाव नव्हते. नंतर यूपीए सरकारनेही एक आरोपपत्र दाखल केले, त्यातही माझे नाव नव्हते. तरीही माझा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. माझी काही चूक नसताना राजीनामा घेण्यात आला आणि माझ्या नावाची बदनामी झाली, हे शल्य माझ्या मनात आजही कायम आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून पाचव्या, पाचव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आलो. हे कशासाठी केले हा फक्त प्रश्न विचारला, त्यावर एवढे काहूर माजले. सगळे खूप रागावले. त्यामुळे यापुढे या विषयावर बोलायचे नाही, असे मी ठरवले आहे,” असे उद्विग्नपणे छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळ यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत गेली. या दोन नेत्यांविषयी बोलताना भुजबळ म्हणाले, “मी शिवसेना सोडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची गोष्टच वेगळी होती. त्यावेळी मी कुठेही कटू भूमिका घेतली नव्हती, मी शांतच होतो. पण, ते सारखे मला लखोबा, लखोबा म्हणायचे आणि ते व्यंगचित्रांतून माझ्यावर टीका करत राहिले, त्यातून वाद वाढत गेला. मग मी म्हटले की आपणही बोलायला पाहिजे. परंतु कुठे थांबायचे, हे आम्हाला कळले. पुढे मी बाळासाहेबांवरील खटला मागे घेतला, बाळासाहेबांनीही मला सहकुटुंब जेवायला बोलावले, मिटले सगळे.’’

अजित पवार नेते, मग आम्ही कोण?

‘‘आता मी शरद पवारांच्या विरोधात काही बोलत नाही. मी फक्त चार गोष्टी सांगितल्या, तुम्ही येवल्यात आलात, भुजबळांना विरोध, बीडमध्ये गेलात मुंडेंना विरोध, कोल्हापुरात गेलात मुश्रिफांना विरोध, बारामतीत गेलात, तिथे म्हणालात की अजित पवार आमचे नेते आहेत. मग आम्ही कोण आहोत, हा आमचा प्रश्न आहे, यात टीका कुठे आली? शरद पवार यांचे काम मी जवळून पाहिले आहे. ३० वर्षे मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे काम केले आहे, त्याचा ठसा आमच्या मनावर आहे, असेही छगन भुजबळ यांनी नमूद केलं.

logo
marathi.freepressjournal.in