शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते, काही लोकांनी हे चिकटवले आहे, असे म्हटले आहे. काहीजण आपल्या सोयीने शिवरायांचा इतिहास सांगत आहेत. राजकीय पक्ष, गट, संघटना स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, अशी टीकाही भिडे यांनी केली. बुधवारी सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भिडे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. काही लोकांनी हे चिकटवले आहे. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. स्वार्थासाठी, राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणारे सगळे भाडोत्री आहेत. त्यांच्यामुळे हा गलबला निर्माण झालाय, असे भिडे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरुन सुरू असलेल्या वादाबाबतही भाष्य केलं.
वाघ्या कुत्र्याबाबात काय म्हणाले?
"संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे. ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे. आज माणसे एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी स्मारक तिथेच आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कुणाल कामराच्या मुद्द्यावरही केले भाष्य
कुणाल कामरावरुन विधानसभेत जो धुडगूस सुरू आहे तो काही लोकशाहीला शोभणारा नाही. मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी हा नीचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे. कामरा नावाच्या पद्धतीचं हॉटेलं चालवणं म्हणजे डान्स बारची सावत्र भावंडे आहेत, असे ते म्हणाले.