

विजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन निष्पाप गावकऱ्यांची क्रूरपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेलाकांकेर गावात घडली असून, या हत्येमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या नक्षलवाद्यांच्या एका गटाने माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गावातील रवी कट्टम (२५) आणि तिरुपती सोढी (३८) या दोघांची धारदार शस्त्रांनी हत्या केली. घटनेनंतर नक्षलवादी तत्काळ जंगलाच्या दिशेने फरार झाले. माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केले होते, त्यानंतर अशाप्रकारची घटना घडली आहे.
यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी इलमिडी थाना क्षेत्रातील मुजालकांकेर गावात नक्षलवाद्यांनी भाजप कार्यकर्ता सत्यम पुनेमची गळा दाबून हत्या केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पुनेम हा स्थानिक भाजप मंडळात सक्रिय कार्यकर्ता होता. घटनेच्या ठिकाणाहून मिळालेल्या पत्रकात नक्षलवाद्यांच्या "मद्देड एरिया कमिटी"ने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे नमूद करण्यात आले होते. पत्रकात पुनेमवर पोलिसांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, बस्तर विभागातील सात जिल्ह्यांमध्ये चालू वर्षभरात सुमारे ४० लोक नक्षल हिंसेचे बळी ठरले आहेत. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ११ भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.